औरंगाबाद :’कोरोना’ प्रादुर्भाव कमी व्हावीत यासाठी नागरिकांनी जास्त गर्दी करू नये. अशा सूचना वारंवार आरोग्य विभागाच्या वतीने देण्यात येत आहे. यामुळे मंगलकार्यालय आणि लॉन्स असोसिएशनच्या वतीने सूचनांचे पालन केले जातअसून ’कोरोना’ साठी एक सतर्कता म्हणून मार्च महिन्यात असलेले लग्न समारंभ, साखरपुडा रद्द केले आहेत. जवळपास शहरातील 30 ते 40 टक्के लग्न समारंभ, साखरपुडा समारंभ रद्द केले असल्याचे औरंगाबाद मंगलकार्यालय लॉन्स असोसिएशनचे उपाध्यक्ष विलास कोरडे यांनी सांगितले.
’कोरोना’ने संपूर्ण देशात थैमान घातला आहे. शहरातही एक रुग्ण पॉझिटिव्ह आला आहे. त्यामुळे जास्तीत जास्त उपाययोजना करण्यात येत आहे. त्या पार्श्वभूमीवर मंगलकार्यालय आणि लॉन्स संयोजकांनी गर्दी कमी करण्यासाठी पाऊल उचलले आहे. लग्न, समारंभ रद्द करण्यात आले आहे. यावर्षी मागील वर्षीच्या तुलनेत आधीच लग्नतिथी अत्यंत कमी आहे. त्यामुळे आधीच यावर्षी लग्न समारंभ कमी होणार आहे. त्यात आता ’कोरोना’ ने कहर घातला आहे. त्यामुळे सर्व शाळा, महाविद्यालयांना सुट्ट्या देण्यात आल्या आहेत. सर्व कार्यक्रम रद्द करण्यात आले आहे. याशिवाय आता शहरात 30 ते 40 टक्के लोकांनी लग्न समारंभ रद्द केले आहे. तसेच साखरपुडा ही रद्द करण्यात आले आहेत. काहीजणांनी अगदी कमी गर्दीत लग्न समारंभ पार पडण्यावर भर दिला असल्याचे कोरडे यांनी सांगितले. तसेच जे लग्न समारंभ कमी गर्दीत होत आहेत त्यातही त्यांची काळजी घेण्यासाठी सॅनेटाईज, तोंडाला मास्क अशा सुविधा उपलब्ध करून दिल्या जात असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.
लग्नाला येऊ नका
अनेकांनी लग्नाच्या पत्रिका नातेवाईकांना वाटप केल्या आहेत. परंतु कोरोनामुळे काळजी घेण्यासाठी नातेवाईकांना फोन द्वारे लग्नाला येऊ नका असे सांगितले आहे. नातेवाईकांनी राग न मानता एक आरोग्याची काळजी म्हणून लग्नाला बोलविले नसल्याचे संगणूयात आले आहे. साखरपुडा समारंभ देखील घरगुती पध्दतीने केले आहे.